Sunday, July 13, 2014

संस्कृती आणि स्वातंत्र्य


१९४७ अगोदर आम्ही स्वतंत्र होतो, नंतर पारतंत्र्यात गेलो. मानसिक पारतंत्र्य हे अत्यंत वाईट आहे. जोपर्यंत माणूस मनाने स्वतंत्र आहे, तो पर्यंत जगातील कोणतीही शक्ती त्याला पारतंत्र्यात ठेऊ शकत नाही. पण एकदा मनाने खचला कि स्वातंत्र्य त्याला कधीच मिळू शकत नाही. 
भारतीय मुलांना आपल्या पद्धतीने शिक्षण घेऊ द्या. त्यांना आपली संस्कृती शिकवा, आपली भाषा शिकवा, देशाविषयी माहिती द्या, या मातीतला इतिहास शिकवा. तरच हा देश टिकेल नाहीतर शरीराने इंडियन आणि मनाने गुलाम झालेल्या लोकांचा हा देश असेल. 

भारतीयांच्या मानसिक गुलामीची कीव वाटते.


गेली शेकडो वर्षे भारत देश पारतंत्र्यात होता, पण त्या काळी सुद्धा भारतीय स्वातंत्र्य जपत होते. त्यामुळेच ते स्वातंत्र्यासाठी लढले. अनेकांनी बलिदान दिले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण आज अनेक भारतीय गुलामीतच जगत आहेत, हि गुलामी मानसिक आहे, वैचारिक आहे. 
परवा एका इंग्रजी शाळेत लहान मुलांना शिक्षकांनी खूप मारले कारण ते मराठीत बोलत होते.  अशा नालायक शिक्षकांची कीव वाटते. स्वतः गुलाम आहेतच पण पुढील पिढ्या सुद्धा यांना गुलाम घडवायच्या आहेत. पुण्यासारख्या सुधारलेल्या शहरात अशा घटना घडत आहेत. मी भारत भर अशा शेकडो शाळा पहिल्या आहेत, जिथे इंग्रजी बोलणेच आवश्यक असते. स्थानिक भाषेला काही महत्व नाही. पालक सुद्धा मूर्ख आहेत, आणि शाळेत शिकवण्याचे नाटक करणारे महामूर्ख. अशांना शिक्षक म्हणणे योग्य वाटत नाही.

Saturday, July 12, 2014

जीवन घडविणारे गुरु!


एके दिवशी सदाशिव पेठेतून चाललो होतो, स्त्याच्या बाजूला एका आकर्षक व्यक्तिमत्वाने माझे लक्ष वेधले. पांढरी शुभ्र दाढी, भारतीय पेहराव व डोक्याभोवती पांढरे कापड गुंडाळलेले होते. मी त्यांचा फोटो कुठेतरी पाहिलेला होता. मी चटकन पुढे झालो आणि त्यांना विचारले? आपण डॉ. विनोद का? ते म्हणाले, हो. मी पटकन त्यांना नमस्कार केला, त्यांची योगावरील काही पुस्तके मी वाचलेली होती. त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाले ये ना. आम्ही त्यानंतर बराच वेळ चर्चा केली. माझा योग शास्त्राविषयीचा थोडा फार अभ्यास होता. बोलताना मी योगात करिअर करणार असल्याचे त्यांना सांगितले, व आपण मार्गदर्शन करा अशी विनंती केली.
त्यांनी होकार दर्शविला, व म्हणाले कि तू माझ्या घरीच रहायला ये, येथेच साधना कर आणि अभ्यासहि चालू ठेव. मला त्यांचा सल्ला पटला पण, मनात शंकाही आली कि पहिल्या भेटीतच हे इतके चांगले कसे काय वागत आहेत?
त्यानंतर काही दिवसांनी मी त्यांच्याकडे राहायला गेलो, योगसाधना सुरु केली. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप वेगळी होती, अतिशय शांतपणे, हळुवार व सहज योगासने करायला त्यांनी शिकवले, त्या अगोदर अशा पद्धतीने मी कधीही योग केलेला नव्हता. योगाबरोबरच त्यांनी मला शिक्षण चालू ठेवण्यासाठी प्रवृत्त केले. मी साधारण पाच वर्ष त्यांच्या घरी राहिलो. त्या कालावधीत मला समजले कि, माझ्याप्रमाणेच त्यांनी अशा पद्धतीने अनेक ग्रामीण भागातील मुलांना शिकविले आहे, त्यांचे जीवन घडविले आहे. प्रचंड यशस्वी व सुखी समाधानी जीवन ते सर्वजण जगत आहेत. मला पहिल्यांदा खूप आश्चर्य वाटायचे, कि हे लोक इतके शांत कसे राहू शकतात, कायम आनंदी कसे दिसतात. कधी कधी तर असेही वाटायचे कि हे सर्व जन दिखावा तर करत नाही ना? मी काही जणांना विचारायचो सुद्धा, कि कसे करता हे सर्व? खूप दिवसानंतर मला जाणवले कि या सर्व गोष्ठी आपोआप घडत असतात, योग साधनेचा तो परिणाम असतो.
अनेक वर्ष साधना केल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी दोन वर्ष देशसेवेसाठी दिली, मोटार सायकल वरून चार महिने संपूर्ण भारत भ्रमण केले, व भारतातील अनेक मोठमोठ्या व्यक्तींना भेटलो.
एका कंपनीत नोकरी करणारा मी एक साधारण व्यक्ती होतो. व्यवसाय, उद्योगधंदे याविषयी काहीही माहिती नव्हते. घरी शेती होती, आर्थिक पाठबळ नव्हते. पण एकदा मानसिक पातळीवर आपण सशक्त झालो कि जीवनात ठरवू ते करू शकतो याचा अनुभव मी सध्या घेत आहे.
चार वर्षापूर्वी मी स्वतंत्र व्यवसाय सुरु केला, व सध्या एक यशस्वी, समाधानी व आनंदी उद्योजक असल्याचा मला अभिमान आहे

Thursday, July 3, 2014

छत्रपती शिवरायांचे वारस आहोत आपण! कधीही लाचार होऊ नका.


फक्त विचारवंत युवकांसाठी! 
मराठ्यांनो, शत्रूच्या मनात दहशत निर्माण करून स्वतःचे हक्क स्वकर्तुत्वावर मिळवणाऱ्या छत्रपती शिवरायांचे  वारस आहोत आपण! त्यांनी आपला हक्क लढून मिळवला, भिक मागून नव्हे. कुठल्याही फुकटच्या सवलतीसाठी लाचार होऊ नका, आपणामध्ये हिमत असेल, जिद्द असेल तर आपण पाहिजे ते मिळवू शकतो. 

आरक्षणाने आपल्या जीवनात काही फरक पडणार नाही. आपण मेहनत करून स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करूया. आरक्षणाच्या कुबड्या घेऊन दुबळे बनू नका. प्रगत देशामध्ये मागास म्हणून जगू नका. 
पैशाने गरीब असलात म्हणून काय झाले? मनाने कधीही गरीब राहू नका. लक्षात ठेवा, जर कोणतीही गोष्ट कमी प्रयत्नात किंवा फुकट मिळाली तर त्या वस्तूची खरी किमत कळत नाही. त्यामुळे आरक्षणासारख्या दुबळ्या कुबड्या फेकून द्या. सामर्थ्यवान व्हा. 

मी जातीवर आधारित आरक्षणाच्या विरोधात आहे. जाती संपवायच्या असतील तर जातीनुसार आरक्षण देऊन कसे चालेल? एकीकडे बोंबा मारायच्या कि आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, आणि दुसरीकडे जातीवादाला प्रमोट करायचे? वा रे वा सरकार!